सातारा : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जागृती मोहीम होती घ्यावी. भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडाव्यात, असे आदेश राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी दिले.

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणूक-2016 अंतर्गत सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांच्या विभागीय आढावा बैठक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. सहारिया बोलत होते. बैठकीला राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) एस.पी.एस. यादव, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील आदी उपस्थित होते.

या चार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायती निवडणुकीचे कामकाज योग्य दिशेने चालले असल्याचे सांगून श्री. सहारिया म्हणाले, नगरपरिषदांच्या निवडणुकीत 70 टक्के मतदान होते. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करा. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये मेळावे, रॅली, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड येथे भितीपत्रके चिकटवून व होर्डींग लावून जनजागृती करावी. या कामासाठी मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. पक्षाकडून किंवा उमेदवारांकडून पैसे, मद्य तसेच इतर वस्तूंचे वाटप करण्यात येते, त्यावर निवडणूक निरीक्षकांनी तसेच पोलीस विभागाने गस्त वाढवून अशा वाटपावर अंकुश ठेवावा. प्रत्येक अधिकाऱ्याने आपली भूमिका काय आहे हे समजावून घ्यावे. सर्व उमेदवारांना समान संधी उपलब्ध करुन द्यावी. तसेच उमेदवारांकडून 30 दिवसाच्या आत खर्चाचा तपशील घेवून तो योग्य आहे किंवा नाही हे तपासावे. कोणताही अधिकारी, कर्मचारी निवडणुकीच्या कामात कुचराई करत असेल त्याच्यावर प्रशासकीय कारवाई करा, असेही त्यांनी सांगितले.

श्री.चोक्कलिंगम म्हणाले, सर्व पक्षांकडून तसेच उमेदवारांकडून वेळेत खर्च घ्यावा. कोणाचीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्या. 500 व 1 हजार रुपयांच्या नोटा वापरातून बंद केल्या आहेत. त्या नोटा निवडणुकीच्या काळात वापरता येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. कुठलाही उमेदवार प्रलोभन देत असेल अशा उमेदवारावर कायदेशीर कारवाई करा. सोशल मीडियाद्वारे कुणी अफवा पसरवत असेल अशा व्यक्तींवरही कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

श्री. चन्ने म्हणाले, वोटर स्लीपचे जास्तीत जास्त वाटप करा. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविण्यास मदत होते. वोटर स्लीप वाटण्याची जबाबदारी नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांची आहे. आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करा म्हणजे तक्रारी कमी येतील. विविध परवान्यांसाठी एक खिडकी योजना राबवा. ज्या शस्त्रधारकांवर गुन्हे नोंद आहेत. अशा शस्त्रधारकांचे शस्त्र जमा करुन घ्यावे. पक्षाच्या किंवा उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदान समानतेने वाटप करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

श्री.यादव म्हणाले, नगरपरिषद व नगरपंचायती यांच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी पोलीस विभागामार्फत सर्व मदत केली जाईल.

श्री.नांगरे-पाटील म्हणाले, नगरपरिषद व नगरपंचायती यांच्या होणाऱ्या निवडणुका भयमुक्त वातावरणात करण्यासाठी पोलीस विभागाकडून विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

बैठकीत जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल व पोलीस अधीक्षक संदीप पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी रणजीतकुमार व पोलीस अधीक्षक विरेश प्रभु, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व पोलीस अधीक्षक प्रभारी महादेव तांबडे व सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी निवडणुकविषयी कामकाजांच्या उपाययोजनांची माहिती दिली.
Next
This is the most recent post.
Previous
Older Post
Axact

Post A Comment:

0 comments: